बुधवार, ३ नोव्हेंबर, २०१०

मी इतुका वेडा 

तंद्रीत अपुल्या असायचो मी जेव्हा

मज सुचतच नव्हते दुसरे काही तेव्हा

प्राध्यापक होते शिकवीत कविता छान

रूप तुझे न्याहाळत होतो करून जिवाचा कान

मी इतुका वेडा असे कसे मग घडले

मज नव्हते ठाऊक आणिक नाही कळले.

सहलीत लावलेल्या गाण्याच्या त्या भेंड्या

नजर-भेटीने उडवल्यास तू माझ्या दांड्या

आणि नंतर त्या संध्याकाळी रम्य

आपल्या चालीत सुद्धा होते किती साम्य

का मुद्दामच तू सूर माझ्याशी जुळवलास

जसा करात माझ्या कर तुझा मिळवलास

मी इतुका वेडा असे कसे मग घडले

मज नव्हते ठाऊक आणिक नाही कळले.

त्या दिवशी होते संमेलन आठवते....

तव भेटीसाठी मन आतुर झाले होते .

रातराणी, परी तू सालंकृत अवतरलीस

आणि कृष्णमय  मनात माझ्या राधेपरी भरलीस

तुझ्या आगमनाने घडले भलतेच आक्रीत

इंग्रजी स्तुतीकाव्यही म्हटले  मी अस्खलित

 मी इतुका वेडा असे कसे मग घडले

मज नव्हते ठाऊक आणिक नाही कळले.

कातरवेळी एकदा  सागर किनारी

मन-सागरामध्ये नुसती

भावनांना आली होती भरती

चालता चालता गेलो होतो पार टोकाला

पाणिग्रहण खरंच  केले होते,

आवरणार कसे त्या मिठीला

ओल्या बाहुपाशात मी तुझ्या विरघळलो होऊन  मीठ

अधरा वरी जुळले अधर, पापणी तुझी ही मीट...

 मी इतुका वेडा असे कसे मग घडले

मज नव्हते ठाऊक आणिक नाही कळले.
     ((मंगेश पाडगावकर यांची माफी मागून )

     ("जिप्सी" मधील  कवितेचे मुलाच्या मनातील काल्पनिक  भाव - उन्मेष )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा