रविवार, २८ ऑगस्ट, २०११

पन्हाळगड ते विशाळगड : एक वर्णनीय ट्रेक : दिवस तिसरा


दिवस तिसरा: १५ ऑगस्ट : शाळेतील भावपूर्ण  झेंडावंदन , पावनखिंड धबधबा, विशाळगडाला भोज्या करून परत पुण्यात...
         असे खूप कमी दिवस असतात जेव्हा आपण ठरवून वेळेवर उठतो आणि उठतोच ! स्वातंत्र्यदिन हा असाच एक दिवस ! शाळेत  झेंडावंदन करूनच पुढे जायचे ठरवले होते. भल्या पहाटे उठून  आन्हिके उरकून साडेसात वाजताच आम्ही तयार होतो. शाळेचा एकूण पट होता "चार" ! तिसरीत एक जोडी (१ मुलगा आणि १ मुलगी) आणि चौथीत एक जोडी !  तरीहि शाळा मात्र उत्तम चालत असल्याचे दिसत होते.
पांढरेपाणी गावातील शाळेतील वर्ग स्वातंत्र्य दिनाची तयारी करताना 

एकंदरीतच तक्ते, फळे माहितीने भरभरून वाहत होते. गावातील माननीय पाहुणे (महेश साचे) यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार होते. कुण्या एका तलाठ्याच्या "सौ". सुरेखा चाचे  आणि शिक्षण समितीच्या लाजाळू अध्यक्षा कोणीतरी चाचे या सुद्धा ओचे-पदर सावरत आल्या होत्या.  २-३ गणवेश न घातलेली (बहुधा पाहुणी) मुलेसुद्धा हजार होती.  आमच्या दृष्टीने त्या दिवशी झेंडावंदन होण्याला महत्व होते. आणि ते शाळेबाहेरच्या मोकळ्या मैदानावर झाले. 
६५वा स्वातंत्र्य दिन चिरायु होवो !

पाऊस जणू तेवढ्या वेळाकरता स्वतःहून  ढगाआड लपला होता. ध्वजवंदनानंतर वर्गात भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम झाला. यासाठी आमच्यातला हर्षद प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केला गेला.  "भरारी" सारखे ग्रुप दरवर्षी शाळेला वस्तुरूप देणगी देतात आणि त्या वस्तू १५ ऑगस्ट ला वाटल्या जातात अशी तिथली पद्धत होती. वस्तू-वाटपानंतर त्या मुलांची पाठ केलेली ४ ओळींची भाषणे होती. ती मन लावून ऐकायचा प्रयत्न केला. 
उत्तम पाठांतर केलेले भाषण देताना पांढरे पाणी शाळेतील एक विद्यार्थी !

नंतर आमची व इतर उपस्थितांची आटोपशीर मनोगते झाली. एकदमच वेगळा अनुभव होता तो! आम्ही देऊ केलेली रोख देणगी कोळी सरांनी नम्रपणे नाकारली व पुढील वेळी "वस्तू"रूप देणगी घेऊन या असे निमंत्रण दिले. त्यांच्या अगत्याने भारावून जड पावलांनीच शाळा सोडली. हेगिष्टे यांच्याकडे पोह्याचा नाश्ता केला. कनक-दादा यांची सौ.हेगिष्टे यांच्या माहेरची काहीतरी ओळख निघाली. मात्र त्यामुळे पोहे काही स्वस्त मिळाले नाहीत :) असो. पावनखिंडीला जाण्यासाठी आम्हाला जुनी जंगलातील वाट शोधायची होती. मात्र ती वाट सांगू शकतील असे बुजुर्ग गावकरी फार कमी राहिले होते. पांढरेपाणी येथून पावन खिंडीपर्यंत  ६ किलोमीटर अंतर आहे. चांगला डांबरी रस्ता असूनदेखील आम्ही दोनदा जंगलातील वाट धुंडाळण्याचा   प्रयत्न केला. मात्र दोन्ही वेळा तो असफल झाला, एका सुंदर तलावाचे दर्शन घडल्यामुळे अगदीच निराशा वाट्याला आली नाही. 
पावन खिंडीला जाताना लागलेले एक तळे 

पावनखिंडीत उतरताना 
हर्षद चालायला फारच कंटाळला असल्याने तो वाटेत मिळालेल्या जीपने पुढे गेला. आम्ही मजल-दरमजल करत पावनखिंडीला पोचलो. सध्या जी पावनखिंड म्हणून दाखवतात, तो आहे एक ओढा. या ओढ्याचे पुढे एका फेसाळत्या धबधब्यात रुपांतर होते. राजगिरा लाडूंचा येथे नाश्ता करून आम्ही धबधब्याच्या शेजारील शिडीने खिंडीत उतरलो. आम्हाला समांतर कोसळत असलेले पाणी मधेच खट्याळपणे आमच्या अंगावर शिंतोडे उडवत होते.  खिंडीतून वाहत जाणाऱ्या पाण्याचे दृश्य अवर्णनीय होते.
पावनखिंडी-जवळचा धबधबा 

याच धबधब्याच्या वाटेने पुढे गेल्यास खरी पावनखिंड  पाहायला मिळते असे तेथील एका जाणत्या माणसाकडून कळले.  तूर्तास तरी वेळेअभावी तो बेत रद्द केला   आणि विशाळगडाकडे मार्ग आक्रमू लागलो.
पावन खिंडीतून पुढे जाणारी वाट ही अतिशय निसरडी होती. याच वाटेवर हर्षद व कनक यांनी "सिक्सर मारली" (म्हणजे सटकून खाली आपटले) (ट्रेकने मराठी भाषेला बहाल केलेला हा एक वाक्प्रचार रूढ  होत आहे  :) )  गजापूर हे विशाळ गडाच्या जवळचे गाव अजून बरेच लांब होते, त्यामुळे आता एस.टी. ने जावे असे आम्ही सर्वानुमते ठरवले. मात्र "भातताई" नावाच्या गावातून जाणारी एस.टी. चुकल्यामुळे आम्हाला खूपच चुकल्या-चुकल्या सारखे वाटले. गावातील मंदिरात आमचा बाड-बिस्तरा ठेवून आम्ही कोरडा खाऊ फस्त करण्यास सुरुवात केली. कनकला  उद्या लवकर ऑफिस असल्याने तो विशाळगड न करता परत कोल्हापुरात जाऊ असे म्हणत होता, मी सोडून सर्वांची त्याला संमती होती. मात्र एस.टी. काय किंवा जीप काय विशाळगडाकडे जाणारे  किंवा कोल्हापूरकडे जाणारे एकाही वाहन आम्हाला मिळत नव्हते. अखेर ज्या दिशेला जाण्यासाठी पहिले वाहन मिळेल तेथे जायचे असे ठरले.  मंदिरात सुमारे दीड तास वेळ घालवावा लागला. या वेळेत बायकर्स चा एक ग्रुप येऊन जेवून गेला,  आम्ही भोपळ्याचे घारगे खाल्ले, एक जळूने आम्हाला सरपटत नाचून दाखवले. अक्षयला कुठल्याच वाड्यांची नावे नीटशी आठवत नव्हती, तरीही तो अनामिक बिनधास्तपणे चुकीची नावे घेत होता, याबद्दल त्याचे कौतुक करावे की चेष्टा  हे कळत नव्हते!! त्याने हशा मात्र बराच मिळवला हे नक्की...   देवाने माझी मनात सुरु असलेली प्रार्थना ऐकली आणि आम्हाला विशाळ-गडाकडे जाणारी वडाप (एक प्रकारची जीप) मिळाली.  पायांना जरा आराम मिळाला, ३ दिवसांत प्रथमच आम्ही गाडीने प्रवास  करत होतो.  पाच-सहा किलोमीटर चा तो पल्ला लवकरच संपला. आणि पावणे चार वाजता एस.टी. विशाळगडाच्या पायथ्याशी उभी होती...कोकण कड्याचे प्रेमळ रांगडेपण दाखवणारे अनेक रौद्र-सुंदर कडे आणि श्रावणाच्या उत्सवात सामील होण्यासाठी अवघ्या सृष्टीसाठी घातलेले ते हिरवे सडे !!!
विशाळगड 

  कोल्हापूर ला जाणारी एस. टी. साडेचार ला असल्याने पळत पळत गडावर निघालो. पर्वती (पुण्यातील एक प्रसिद्ध टेकडी) इतक्या पायऱ्या दिसत होत्या. हर्षद-अक्षय या जोडगोळीला खालीच ठेवून कनक, दादा, व मी भराभरा पायऱ्या चढून वर जाऊ लागलो. विशाळ गडा बाबतीत मात्र "दुरून डोंगर साजरे" असा अनुभव आला. गडावर एक दर्गा असल्याने गडाचे शिवकालीन वैभव संपुष्टात आले आहे. शिवाय वरील वस्त्या इतक्या बकाल आहेत की त्यापेक्षा झोपडपट्टी बरी!  किल्ल्यावर विठ्ठल रखुमाई चे मंदीर आहे ज्याची अवस्था यथातथाच आहे, फुलाजी यांचे समाधी शोधून देखील सापडली नाही. यवनांना ती विचारून उपयोग नव्हता.  किल्ल्यावर झेंडावंदन केले होते हेच विशेष! साडेचारची एस.टी. पकडायची असल्याने तिच्यावर एक 'डोळा' ठेवून खाली उतरू लागलो.
विशाळ गडावरून टिपलेले धुक्यात हरवू पाहणारे स्थानक 

  सगळे काही वेळेत आटोपले होते. विशाळगड ते कोल्हापूर या प्रवासात आम्हाला  "पांढरेपाणी" गावापासून केलेले सगळे पद-भ्रमण आठवत होते, कारण त्याच रस्त्याने गाडी (पांढरेपाणी - मलकापूर मार्गे) कोल्हापूरला जात होती. शनिवार पासून फक्त आवाज देत अस्तित्वाची जाणीव करून देणारा  मोर या प्रवासात अखेर दिसला. त्याचे विशेष कौतुक आता राहिले नव्हते.  कोल्हापुरात पोचायलाच आम्हाला ८ वाजले. कर्नाटक परिवहनाची तथाकथित (SO CALLED ) थेट पुण्याला जाणारी गाडी मिळाल्यामुळे आम्ही खूष झालो. ही गाडी जेवणासाठी कधीतरी थांबली तेव्हा पाव-भाजी व थंड पेयाने पोटाला शांत केले. आणि शांतपणे गाडीत झोपून गेलो, पुण्यात गाडी पोचली तेव्हा दोन  (रात्रीचे) वाजले होते...पाय अक्षरशः गळ्यात अडकवून चालावे (?) असे वाटत होते,  सहनशक्तीची कसोटी पाहणारा ट्रेक अखेर पूर्ण केला होता,याची आगळेच समाधान मनात होते. मसाई पठाराची हिरवाई  डोळ्यांना कायम निववत राहो आणि पावनखिंडीचे ते साहसी पाणी मनाला कायम पवित्र ठेवो अशीच काहीशी भावना (कदाचित यापेक्षा सोप्या शब्दांत मांडलेली) सगळ्यांच्या मनात होती... तीन दिवस आम्ही निसर्गासोबत जगलो होतो..खूप काही शिकलो  होतो. (समाप्त)
मसाई चे नेत्रसुखद पठार !

५ टिप्पण्या:

  1. Ekandarit trek jordar zalay tar..gud gud
    Dar varshi 15 Aug la (kontya na kontya) shalet jayla miltay hee best gosht ahe..

    "मात्र त्यामुळे पोहे काही स्वस्त मिळाले नाहीत !!" hahaha..Lai khaas..typical Puneri bana :D

    Ani ho tumhi kiti wela nashta kelay arey? trek karayla gelele ki khayla? Nuste kadhi korda khau n kadhi ola..Thikanachya nawat pan "bhaat"(Tai) ahe :D

    N warnan uttam..Kotyadhishpana NA dakhwilyane adhik wachneey :)

    उत्तर द्याहटवा
  2. atishay sundar ani oghavatya shailit lihila ahe, majhapan panhala te vishalgad trek jhala :P

    उत्तर द्याहटवा