बुधवार, ४ जुलै, २०१२

चावंड: प्र स न्न ( करणारा ) गड


शनिवार २३ जून २०१२

जुन्नर भागातील अनेक प्रेक्षणीय किल्ल्यांपैकी एक म्हणजे "चावंड". "असले कसले विचित्र नाव" किंवा "तू नवीन किल्ले शोधून काढतोस" ,  "तू मनाची नावे देतोस" अशा खोचक टिप्पणी करणाऱ्यांसाठी हा श्लोक :  
चामुंडा अपभ्रंशे चावंड | जयावरी सप्तकुंड || गिरी ते खोदुनी अश्मखंड | प्रसन्नगडा  मार्ग निर्मिला ||

स्पष्टीकरण:                                                                                                                  हे नाव "चामुंडा" या देवीच्या नावाचा अपभ्रंश असून , प्रसन्नगड हे त्याचे दुसरे नाव आहे.  सप्तकुंडचे स्पष्टीकरण पुढे ओघाने येईलच.  तर, अशा या किल्ल्यावर जाण्याची गेली अनेक वर्षे इच्छा होती. २००६ ला हडसर-जीवधन-नाणेघाट-  ट्रेक केला तेव्हा 'चावंड'ला प्रदक्षिणा घातली होती. तसेच २००८ साली दुर्ग-ढाकोबा च्या ट्रेक च्यावेळी तोंडात घातलेला घास कोणीतरी  घशातून काढून घ्यावा त्याप्रमाणे किल्ल्यापासून २  किलोमीटर वर असताना पावसाने आमचा बेत हाणून पाडला होता. त्यानंतर जुन्नर भागातला हा एकटाच किल्ला बघायचा राहिल्याने आवर्जून १ दिवसाचा ट्रेक करणे आवश्यक होते...२०१२ च्या जून मध्ये तशी संधी साधली. 

       पाऊस नुकताच सुरु होत होता. आर्द्रा नक्षत्र लागले होते, तरीहि म्हणावा तसा पावसाचा जोर वाटत नव्हता. त्यामुळे १ दिवसाच्या ट्रेकच्या योजनेला उदंड प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. पण रास्त अपेक्षा ठेवूनसुद्धा न पडलेल्या पावसाप्रमाणे नेहमीचे मावळे किल्ल्यावर न येताच "पडले". मी व  सिद्धार्थ बिनीवाले असे दोघेच उरलो. सिद्धार्थने त्याची बाईक काढली  व २३ तारखेला पहाटे ६ वाजता आम्ही निघालो.

       वाहतूक अगदीच तुरळक असल्याने वाऱ्याप्रमाणे भर्राट निघालो.  मुंबई-पुणे महामार्गावर पोचल्यावर तर  "VEGA (वेगा)" चे  हेल्मेट घातल्याप्रमाणे आम्ही वेग घेतला. राजगुरुनगर सोडल्यानंतर एका झकास टपरीवर फक्कड चहा घेतला. ढगाळ वातावरण असले तरी पाऊस नसल्याने बाईकवरून जाण्यात मजा होती. ८ च्या सुमारास जुन्नर गाठले. दाऱ्या घाटाकडे जाणारा रस्ता पकडला.हाच रस्ता पुढे जीवधन, नाणेघाटाकडे  घेऊन  जातो.  जसजसे चावंडच्या जवळ जात होतो तसतसा रस्ता खराब होत चालला होता आणि निसर्ग अधिकाधिक मनमोहक ! आपटाळे गाव सोडले आणि ढग अचानक दाटून आले; अवघे वातावरण आल्हाददायक झाले.  विचारत विचारत आम्ही पावणे नऊ वाजता चावंड-वाडीत पोचलो. पायथ्यापासून पाहिल्यास बुटका वाटणारा  हा किल्ला समुद्र सपाटीपासून ३४०० फूट उंच आहे. गावातील शाळेसमोर गाडी लावून आम्ही एका पारावर थोडा वेळ बसलो. आजूबाजूचे फोटो काढले.
        वर जाण्यास पंधरा मिनिटे पुरतील असे वाटून झपझप पायवाटेने जाण्यास सुरवात केली. सिद्धार्थ भूगर्भ-शास्त्रज्ञ (GEOLOGIST ) , पर्यावरण-वादी,  वनस्पती-शास्त्रज्ञ  वगैरे असल्याने वाटेतील प्रत्येक झाडांनाच नव्हे तर दगडांना सुद्धा नाव मिळत होते; ज्ञानात भर पडती आहे असे तेव्हा वाटून गेले पण त्यातील एकसुद्धा नाव आत्ता आठवत नाहीये. असो. एके ठिकाणी जेथे वाटेला दोन फाटे फुटत होते, तेथून चुकीचे वळण घेतले. (वाट चुकली नाही तर तो ट्रेक कसला ! )  खालून आमची गम्मत बघत असणाऱ्या  गावकऱ्याने आम्हाला "मार्ग"दर्शन केले.  योग्य वाटेवर आल्यानंतरसुद्धा  त्याचे "पुढे चला, पुढे चला " चालूच होते. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढे गेलो.  
            माथ्यावर जाण्यासाठी एक अवघड टप्पा पार करावा लागतो: खडकातील पायऱ्या ! त्याला कडेने रेलिंग व दुसऱ्या बाजूने बोल्ट्स लावून तार ठोकलेल्या असल्याने भीतीचे कारण नव्हते. या स्पॉट वर फोटो-सेशन करून आणि  तरीहि सावधपणे वर चढलो. या रॉक पॅच नंतर ४०-५०  उंच पायऱ्यांनी  आम्हाला दमवले. आम्ही गडाच्या मुख्य प्रवेशद्वारात पोचलो होतो. दरवाजावर गणपतीची कोरीव मूर्ती आहे. बेसाल्ट  खडकाच्या उंच भिंतीमुळे दरवाजासामोरचा  भाग आकर्षक झाला आहे. दारातून दहा पायऱ्या चढून वर गेल्यावर दोन वाटा लागतात. उजवीकडे जाणारी वाट  उध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते तर डावीकडची वाट तटबंदीला समांतर जाते. गडावर अभ्यासासाठी भरपूर गोष्टी आहेत. अनेक प्राचीन अवशेष,  वनस्पती-कीटक वैविध्य, रंगी-बेरंगी पक्षी -  इतिहास, भूगोल, निसर्ग-शास्त्र आवडणाऱ्यांनी सहज रमून जावे असा किल्ल्याचा माथा आहे. मी यापैकी एकही नव्हतो , तरीहि डोंगरवेडा म्हणून तेथे रमून गेलो. वाटेत एक जुना चौथरा, शेजारी उखळ दिसले. त्या मोठ्ठ्या दगडी उखळीला "भीमाची वाटी" वगैरे उपमा देऊन झाल्या.  तटबंदीच्या बाजूने चालत असताना गडाचा घेरा बराच विस्तीर्ण असल्याचे लक्षात आले. पाण्याची टाकी अधून-मधून न चुकता दिसत होती. ससाणा हा पक्षी जणू प्रत्येक किल्ल्या"वर" गस्त घालण्यासाठीच जन्माला आला आहे असे वाटून गेले. त्याचे दर्शन कोणत्याही किल्ल्यांवर अगदी सहज होते.. यावेळी मात्र त्याची जात सुद्धा समजली (क्रेडिट्स: सिद्धार्थ , नाव अर्थातच मला आठवत नाहीये; पण कसलासा  "हेडेड फाल्कन" होता म्हणे )  किल्ल्यावर एक मंदिराप्रमाणे भासणारी एक उद्ध्वस्त वास्तू आहे. त्याच्या कोनाड्यांमध्ये गणपतीची मूर्ती दिसते. समोरच एक एके काळी सुंदर असावा असे वाटायला लावणारा तलाव आहे.  त्या उध्वस्त अवशेषांमध्ये लिलीसारख्या फुलांचा एक छानसा ताटवा डोळ्यांना मोहवून गेला.  येथून आम्ही मोर्चा वळवला तो किल्ल्यावरील टेकडीकडे जेथे चामुंडा देवीचे मंदीर नव्याने बांधले आहे. तेथपर्यंत जाण्यासाठी आम्ही नवीन वाट तयार केली.  या आडवाटेत एक सुंदर गोम दिसली. तिचे फोटो काढण्यात वेळ घालवला. मंदिरापासून किल्ल्याचे विस्तृत दृश्य (PANORAMIC VIEW )  मोठे रमणीय दिसत होते. मंदिरासमोर नंदी आहे; ही गोष्ट थोडी कोड्यात टाकणारी वाटते.; कारण शंकराची पिंड कुठेच दिसली नाही. टेकडीवरील या मंदिरातून खाली उतरताना बरोबर पाय-वाटेने खाली आलो. गडाच्या वायव्य भागात एकमेकांना लागून अशी ७ टाकी आहेत; ही ७ मातृकांशी निगडीत आहेत: ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा ! सुरवातीला आलेल्या श्लोकातील सप्तकुंड म्हणजे हीच सात मातृके. यापैकी चामुंडा सर्व-श्रेष्ठ समजली जाते. देवीचे हे रूप जसे क्रूर मानले जाते; तसाच या किल्ल्याचा एके काळचा लौकिक असावा. किल्ल्याचे ईशान्येकडील बेलाग कडे व तेथी नसलेली तटबंदी पाहून याची खात्री पटते; म्हणूनच बहादूरशहा निजामाला येथे कैदेत ठेवण्यात आले होते.
               किल्ला बघण्यास फार वेळ लागला नाही; आजूबाजूला असलेल्या सह्य- रांगांपैकी  फक्त जीवधन ओळखता आला. एव्हाना १२ वाजत आले होते. जेवण करण्यासाठी आम्ही पुन्हा मुख्य दरवाजापाशी आलो.  जेवणाबरोबरच गप्पांची शिदोरीसुद्धा सुटली. तासभर मजेत गेला.  किल्ल्यावर करण्यासारखे आता काहीच नसल्याने लगेच खाली उतरलो.  गावातील मुलांचा VOLLEYBALL  चा खेळ बघितला आणि ५ मिनिटे पारावरील गावकऱ्यांच्या शिळोप्याच्या गप्पा ऐकून बाईक काढली. जाताना कैरीचे झाड दिसले आणि कैऱ्या पाडण्याचा मोह झाला. तेथे थांबून यशस्वीपणे २ कैऱ्या पदरात "पाडून घेतल्या".
परत जाताना वेळ काढण्यासाठी अवसरी घाटाच्या "वन-उद्यानाला" भेट दिली. तेथे कसले तरी पुलाचे काम चालू असल्याने उद्यान बंद होतेअसे कळले.  सिद्धार्थ येथे पूर्वी शाळेबरोबर येऊन गेला असल्याने त्याने तेथील प्राणी-संवर्धन केंद्राची  जुजबी माहिती दिली. पण त्या वेळी  तेथे फक्त मनुष्य-प्राणीच असल्याने आम्हाला घराचा रस्ता धरावा लागला. ४ वाजता आम्ही पुण्यात परत आलो होतो.  अक्षरशः हाफ-डे ट्रेक करून आम्ही पुन्हा संध्याकाळचे बेत आखण्यास "गुडलक" मध्ये हजर होतो.
                 काय मिळाले या अर्ध्या दिवसात ? सिद्धार्थच्या मते आपण खऱ्या अर्थाने जगतो ते यासाठी : आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी ! सोमवार-शुक्रवार चे रुटीन  पोटासाठी काय काय करावे लागते ते शिकवते पण निसर्गात रमवणाऱ्या  ट्रेक सारखी एखादी गोष्ट आपल्याला का जगायचे ते सांगून जाते.

२ टिप्पण्या:

  1. Konitari mhanalay "Many climbers or trekkers become writers because of the misconceptions about Trekking." Pan aaj hech wakya tu khote tharawales... Tu donhihi uttamritya karat ahes...Tuze warnan wachun Chawand killyawar jaaun alyasarakhe watat ahe... Pan nusate watat ahe pratyaksha "apan" jauch.... ;-)

    उत्तर द्याहटवा