शुक्रवार, २७ जुलै, २०१२

विसा ( VISA ) पूर : शेवटचा (?) ट्रेक !



रविवार, २२ जुलै २०१२

जुलै सुरु झाला की एक प्रसन्न आणि हिरवा सुगंध वातावरणात भरून राहतो ; सर्दी डोक्यात रुतून बसावी तसा हा वास मनात घट्ट "वास" करून राहतो. अवघ्या सृष्टीला बाळंत करून नव-चैतन्य देणारा जुलै सह्याद्रीच्या पर्वतराजीवर विशेष प्रसन्न असतो. अशा या प्रिय जुलैमध्ये पाऊस सुरु झाला की ट्रेकचा विषय निघतोच, आणि पावसाळी ट्रेक म्हटले की लोहगड हे नाव हमखास पहिले तोंडावर येते;  यंदाचा पावसाळा पूर्णपणे ENJOY करण्यासाठी मी इथे नसणार हे माहीत असल्यामुळे ज्युनिअर कॉलेज पासून जमलेल्या ग्रुप-बरोबर एक ट्रेक तरी टाकायचाच होता ! हरिश्चंद्रगड च्या ट्रेक ची आखणी तब्बल १४ दिवस आधी सुरु झाली होती. माशी कुठे शिंकली ठाऊक नाही पण बहुधा नुकताच माझा नेदरलँडचा VISA मिळाला असल्याने आमचा VISA (विसा) पूर चा ट्रेक नक्की झाला: विसापूर म्हणजे लोहगडचा जुळा भाऊ !
रविवार सकाळी साडेसहाची लोकल असल्याने पाचच्या सुमारास उठलो. ट्रेक च्या दिवशी गजर नसतानासुद्धा जाग कशी येते हे कोडे मला आजपर्यंत सुटलेले नाही. प्राजक्ताची मैत्रीण श्रद्धा मला पावणे सहा वाजता घ्यायला संतोष हॉल चौकात येणार होती; मला फक्त भाजी आणि पाणी एवढेच आणावयाचे होते; आम्ही वेळेत निघालो (उल्लेखनीय बाब ). परत येताना उशीर होणार असे संकेत आम्हाला जातानाच मिळाले . सूर्य-हॉस्पिटल जवळच्या पुलावर श्रद्धाची गाडी पंक्चर झाली. सुदैवाने लगेच रिक्षा मिळाली आणि आम्ही वेळे-अगोदर पुणे स्टेशन वर पोचलो. प्राजक्ता तिची मैत्रीण प्रतिभासोबत आमच्या आधीच आली होती. श्वेता-सागर सुद्धा मागोमाग आले. लोकल सुटायला ५ मिनिटे अवकाश असताना धनश्री आली. ठरलेले ७ जण आले. लोकल मध्ये शिरून जागा पटकावली. धनश्री DELFT  येथे जाऊन  आलेली असल्याने आणि प्रतिभा ऑस्ट्रेलियाला Ph D  साठी जाणार असल्याने लोकल मध्ये आमच्या ग्लोबल गप्पा सुरु झाल्या. कॉलेज  मधील किस्से आणि प्रोफेसर्स च्या गमती जमती सांगताना "प्रतिभा" ही सुद्धा स.प. महाविद्यालयातच होती असे कळले; तीसुद्धा आमच्याच BATCH  ची ! हा आम्हाला धक्का होता (निदान सागरला व मला तरी मोठा धक्का होता; कारण तशा BATCH च्या सर्व मुली चेहऱ्याने माहीत असतात"च" ). असो. 2-3 स्थानके झाली नसतील तोच लोकलला सिग्नल लागला ; पुढे मेगा ब्लॉक  असल्याचे कळले. एक्स्प्रेस ट्रेन्सना धावण्यास प्राधान्य असल्याने लोकल मागेच पडत होती. उशीर होणार हे निश्चित झाल्यावर ट्रेकची पुढील आखणी करण्यासाठी विचारचक्रे एक्स्प्रेसच्या वेगापेक्षा पेक्षा जोरात फिरू लागली. कामशेत ला उतरून बेडसे CAVES  ला जावे की पटकन लोहगड करून परतावे की फक्त भाजे लेणीपर्यंत जावे असे सगळे विचार करून झाले. चिंचवड पर्यंतच लोकल जाणार अशी एक आवई  सुद्धा उठली. पण त्यात काही दम नव्हता. ट्रेन मध्ये असलेल्या गन्या-बाप्या पब्लिकने आमच्या मनोरंजनाची जबाबदारी समर्थपणे पेलली होती. सिंहगड, प्रगती अशा एक्स्प्रेस गाड्या पुढे गेल्यानंतर आमच्या लोकल ला गती मिळाली. बॉरबॉन सारख्या बिस्किटांचा फडशा पाडायला एव्हाना सुरवात झाली होती. फोटो काढणे हाही एक विरंगुळा होताच. मळवली ला 8 वाजता अपेक्षित असलेली लोकल साडेनऊ ला पोचली. दीड तास लेट  असूनही आम्ही बेत बदलला नाही. झपझप पावले उचलत आम्ही गावाच्या दिशेने कूच केले. ढगाळ वातावरण होते, पण पाऊस नव्हता. दूरवर धुक्याआड (न) दिसणारी किल्ल्यांची जोडगोळी आम्हाला खुणावू लागली होती.

लोहगड-विसापूर ची जोडगोळी 


 वाटेत एका टपरी वर नाश्ता  केला. ब्रेड -बटर , पोहे आणि चहा ! भरपेट खाऊन आम्ही भाजे लेणीच्या वाटेने निघालो.
शनिवारीच किल्ल्यावर आलेली मंडळी परत चालली होती. रविवार असल्याने "पब्लिक" भरपूर होतं. चहुकडे  हिरवळच "हिरवळ" होती. लेणीकडे जाण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत, त्या संपेपर्यंत न चढता मधेच एक वाट  विसापूर ला जाते अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पायवाट धुंडाळण्याचा प्रयत्न चालू होता. लेणीच्या तिकीट खिडकीपर्यंत गेलो तरीहि आडवाट काही सापडली नाही. परत काही पायऱ्या खाली उतरून एक निसरडी वाट पकडली. ही वाट विसापूर ला लवकर घेऊन  जाते असे सांगण्यात आले होते. आमच्या मागोमाग अजून एक-दोन ग्रुप येऊ लागल्याने बरोबर चाललो आहोत असा (फाजील) विश्वास वाटू लागला. चढताना कुणाचाही पाय घसरला की "या वयात पाय घसरायचेच" असा "क्लेशदायक श्लेष " ऐकू येत होता. श्रीखंडाच्या गोळ्या श्वेता आणि प्रतिभा यांना वेग घेण्यासाठी चांगल्याच उपयोगी पडल्या. (बाकीच्यांनी सुद्धा तितक्याच चवीने त्या खाल्ल्या ) सुदैवाने पाऊस  नव्हता. त्यामुळे फोटो काढता येत होते ; तशी प्राजक्ताने नीट फोटो काढता यावे म्हणून छत्री आणली होती.
पण ती पिवळी धमक छत्री कॅमेरा वर धरण्या-ऐवजी, फोटो काढून घेण्यासाठीच जास्त वापरली गेली.
तास भर चढण झाल्यावर छोटेसे मैदान लागले . इथून आजूबाजूचे दृश्य पावसाळ्यातील नेहमीचेच असले तरी नवीन होते. हिरव्या रंगाला बहुधा अमर्याद छटा  असाव्यात. हिरवा सह्याद्री डोळ्यांत साठवून आम्ही  विसापूरच्या डाव्या सोंडेच्या दिशेने  जाऊ लागलो.

विसापूर किल्ल्याकडे जातानाचे एक दृश्य 

थोड्याच वेळात धबधब्याची वाट सुरु झाली. चित्रवत वाटणाऱ्या त्या धबधब्यातून वर जाताना बूट-मोजे पूर्ण भिजले. त्याहूनही जास्त आम्ही आनंदात भिजलो. आमच्या मागून येणारा ग्रुप हा अत्यंत थिल्लर मुलांचा होता. त्यांनी बहुतेक आयुष्यात प्रथमच इतका हिरवा रंग आणि धबधबा बघितला होता ; त्यामुळे ती मुले
माकडांहून विचित्र किंचाळत होती. फोटो काढायला थांबून आम्ही त्यांना वर जाऊ दिले. शेवटच्या टप्प्यात पाण्याला थोडा जोर होता मात्र येथून धबधब्याची वाट सोडायची होती. या वाटेने बराच वेळ लागला होता. थोड्या खडकाळ वाटेने वर गेलो.

खडकाळ वाट 


  येथे मारुतीचे मंदीर लागले. बाहेर अश्वाचा पुतळा होता. या पुतळ्यापासून साधारण पन्नास  मोठ्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण गड-माथ्यावर पोचतो. गडावर अनेक तलाव तुडुंब भरलेले दिसत होते. जणू वरूणाची कृपा प्राप्त होऊन ते "भरून" पावले होते. किल्ल्यावर काही पडके वाडे , जुन्या वास्तूंचे अवशेष दिसत होते.  अजूनही पाऊस  पडत नसल्याने फोटोग्राफी ला ऊत  आला होता.

हिरवे कंच पठार, विसापूर 


माथ्यावरील पठारावर फिरताना श्वेताचा  पाय लचकला; श्रद्धाकडे कुठला तरी EASY  स्प्रे असल्याने काम EASY झाले. रेंज आल्याने मुलींनी घरी फोन करून घेतले. मी फोन स्वीच ऑफ करून सृष्टीच्या सोहळ्यात संमीलित झालो. काही वेळाने आमची पावले आपोआप फोटोजेनिक वाड्याकडे वळली.

यथाशक्ती, यथामती फोटो काढून झाल्यावर पोटात काहीतरी ढकलावे म्हणून वाड्या बाहेरच सांडलो. बटाट्याची भाजी, पोळ्या , छोले, दही-भात, तळलेल्या मिरच्या असा मेनू होता. हास्य-विनोद करत जेवण झाले तेव्हा  4 वाजत आले होते. आता खाली जाताना गाय-खिंडीतून जायचे असे आम्ही ठरवले होते. विसापूर ला लांबच लांब आणि प्रेक्षणीय तटबंदी लाभली आहे.

विसापूरची प्रेक्षणीय तटबंदी 


या तटबंदीच्या कडेकडेने चालत गेल्यास गाय-खिंडीकडे जाणारी पायवाट लागते असे प्राजक्ता  आणि  सागरने पूर्वानुभवावरून सांगितले. तटबंदी च्या कडेने चालण्यास सुरवात केली ; पाऊस  पडू लागला होता. सोबत वारा सुद्धा जोरात वाहत होता. काही ठिकाणी तर तटबंदीच्या खालून धबधब्याचे पाणी उलट्या दिशेने, म्हणजे वर उडत होते. तटबंदी पूर्ण फिरून सुद्धा रस्ता सापडला नाही. किल्ल्यावर आलेल्या इतर मंडळींना विचारत विचारत  अखेर आम्हाला एक टेकडी चढून बरोब्बर विरुद्ध दिशेला वाट दिसली. दिसायला ही वाट भयावह होती. धबधब्यातून आता खाली उतरायचे होते. जीव मुठीत धरून आणि हात हातात धरून आम्ही खाली उतरू लागलो. एकमेकांना मदत करत निवांतपणे  धबधबा उतरलो.  सपाट पायवाट आली तेव्हा, फलाहार केला. सफरचंद आणि पेअर फळे खाऊन अधिक ताजेतवाने झालो (आधीच धबधब्यातून खाली आल्यामुळे तरतरीत होतोच) या
पायवाटेने भरभर गेल्यास 20 मिनिटे लागतील आणि आपण साडे-पाचची लोकल पकडू शकू असे प्राजक्ताला वाटले; सागर व मी मात्र साडे-सहा ची लोकल सुद्धा मिळेल की नाही याबाबत साशंक होतो, अंतर खूप आहे याची आम्हाला पुरेपूर कल्पना होती. अजून गाय-खिंड, नंतर भाजे लेणी येईपर्यंत 2 डोंगर, नंतर गावात जायची वाट, आणि मग गावातून मळवली स्टेशन ! बराच मोठा पल्ला गाठायचा होता. चिखल तुडवत , गाणी म्हणत- ऐकत, वाटेतील धबधबे आणि ओघाने येणारी ओंगळ गर्दी चुकवत आम्ही हा टप्पा पूर्ण केला. साडे सहाची लोकल थोडक्यात चुकली. 7:09 ची लोकल येण्यास अवकाश असल्याने स्टेशन जवळच चहा-केक, खाकरे ,फळे असा नाश्ता केला. पाय आता बोलायला लागले होते. लोकल वेळेवर आली. पाचही मुली लेडीज डब्यात गेल्या. मी व सागर ने उभे राहण्यास जागा मिळवली. या लोकल ला फारसे सिग्नल मिळाले नाहीत आणि गाडीने वेग सुद्धा चांगला घेतला होता. श्रद्धा, प्राजक्ता व मी शिवाजीनगर ला उतरलो. श्वेताची सॅक सकाळपासून मी घेतली असल्याने ती देण्यासाठी श्वेताला शोधू लागलो. ती डब्यातून उतरली नाही . प्राजक्ताने व मी पळत पळत तिला सॅक पोचवण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत मी गुडघ्यावर आपटलो. पूर्ण दिवसभर ट्रेकमध्ये पडलो नव्हतो ती उणीव खरचटून (भरून नव्हे) निघाली.

दोन वेगळ्या वाटांनी गड काबीज केला होता. त्याचे समाधान होते.  एक पावसाळी हिरवा दिवस मित्रांसमवेत मस्त गेला होता. "सह्याद्रीची हिरवाई डोळ्यांना निववते ; आंतरिक शांती देते" याचा पुनः प्रत्यय आला.
पुन्हा या सह्याद्रीच्या कुशीत कधी शिरता येईल माहीत नाही. पुन्हा कॉलेजच्या मित्रांबरोबर कधी जाता येईल कुणास ठाउक ..  उगाच काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते.  विसापूर हा किल्ला तसा चुकण्यासाठीच प्रसिद्ध आहे. हे मनोमन पटले होते.
ग्रुप :  उन्मेष, प्रतिभा, सागर, श्वेता, श्रद्धा, धनश्री


आयोजक : प्रतिभा, प्राजक्ता, धनश्री, श्रद्धा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा